रांची – भारतीय जनतापक्षाने झारखंड मधील सरकार पाडण्यासाठी प्रत्येक आमदाराला दहा कोटी रूपये आणि मंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे. तशीच ऑफर मलाही आली आहे असा दावा कॉंग्रेसचे आमदार कुमार जयमंगल यांनी केला असून त्यांनी या प्रकरणात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये जे तीन कॉंग्रेस आमदार मोठ्या रोकडसह पकडले गेले आहेत त्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
ते म्हणाले की काल रात्री पैशासह पकडले गेलेल्या कॉंग्रेस आमदारांपैकी नमन बिक्सल आणि राजेश कच्छप हे मला कोलकाता येथे येण्यासाठी सांगत होते. त्यासाठी मला त्यांनी मोठ्या पैशाची ऑफर दिली होती. ते मला कोलकात्याहून गुवाहाटीला घेऊन जाणार होते. तिथे त्यांनी आमची भाजप नेते हिमंता बिस्व शर्मा यांच्या बरोबर बैठक निश्चीत करण्यात आली होती असा तपशीलही त्यांनी आज प्रसार माध्यमांना ऐकवला.
भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुलाल मरांडी यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून त्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसने स्वतःची पापे लपवण्यासाठी खोटी पोलीस तक्रार दाखल करून पक्षाला बदनाम करण्याचा कट रचला आहे. त्यांचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही. ते त्यांच्या आमदारांचे भ्रष्टाचार आणि गैरकृत्ये लपवण्याचा प्रयत्न करत आहेत,मरांडी यांनी म्हटले आहे.