बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी आणि फलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत एकतर्फी विजय मिळवला. भारताने 8 गडी राखून हा सामना जिंकत स्पर्धेतील आपले विजयाचे खाते उघडले. या सामन्यात स्मृती मानधनाने केलेल्या नाबाद खेळीमुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद झाला आहे. तर भारताच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाची शक्यता वाढली आहे.
या सामन्याच्या सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आल्याने 18 षटकांचा खेळ घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित 18 षटकात 99 धावांवरच गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.4 षटकांत विजयी लक्ष्य पूर्ण केले. पाकिस्तानच्या नाममात्र 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने मॅच विनिंग प्रदर्शन केले.
तिने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत नाबाद 63 धावा फटकावल्या. स्मृतीने 42 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने ही शानदार खेळी केली. तसेच शेफाली वर्मा (16 धावा) आणि शब्बीनेनी मेघना (14 धावा) यांनीही योगदान दिले. परिणामी भारतीय संघाने 11.4 षटकातच 2 बाद 102 धावा करत सामना जिंकला.
भारत अव्वल स्थानी
अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. हा पहिला विजय असला तरी निव्वळ धावगतीच्या मदतीने बार्बाडोस आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारताने अव्वल स्थान मिळविले आहे. तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाल्याने स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना विशेष प्रदर्शन करता नाही. पाकिस्तानकडून सलामीवीर आणि यष्टीरक्षक मुनीबा अलीने सर्वाधिक 32 धावा केल्या. तिच्याखेरीज एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. आलिया रियाज (18 धावा), कर्णधार बिस्माह मरूफ (17 धावा), ओमायमा सोहेल आणि आयेशा नसीम (10 धावा) यांना दुहेरी धावा करता आल्या. याखेरीज इतर 6 फलंदाज एकेरी धावाच करू शकल्या. भारताकडून राधा यादव आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. रेणुका सिंह, मेघना सिंग आणि शेफाली वर्मा यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत सुरेख साथ दिली.