नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी, झारखंडमधील भाजपचे आमदार जय प्रकाश भाई पटेल यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि इंडिया आघाडी मजबूत करण्याची शपथ घेतली. पटेल यांनी पक्षाच्या मुख्यालयात झारखंडचे कॉंग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर, झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर, झारखंडचे मंत्री आलमगीर आलम आणि पक्षाचे मीडिया आणि प्रचार विभाग प्रमुख पवन खेरा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Jharkhand: BJP MLA Jai Prakash Bhai Patel joins Congress)
पटेल हे हजारीबाग लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मांडू विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यापूर्वी ते झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार होते. पटेल म्हणाले की त्यांचे वडील टेक लाल महतो, माजी खासदार यांनी झारखंडसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करायची आहेत.ते म्हणाले की भाजप प्रणीत एनडीएमध्ये आपल्या वडिलांची विचारधारा मला सापडली नाही आणि आता राज्यात इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी काम करण्याची शपथ मी घेतली आहे.
पटेल म्हणाले की झारखंडने राज्यातील सर्व १४ लोकसभा जागांवर इंडिया आघाडीचा विजय सुनिश्चित करण्याचा संकल्प केला आहे. कोणत्याही लोभासाठी किंवा पदासाठी नाही तर विचारधारेसाठी आणि माझ्या वडिलांनी राज्यासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पटेल यांना उमेदवारी देऊ शकते.
मीर म्हणाले की पटेल कॉंग्रेस मध्ये सामील होणे म्हणजे आगामी गोष्टींचे संकेत आहेत. त्यांनी दावा केला की झारखंड आणि पश्चिम बंगालमधील विविध पक्षांमधील अनेक नेते पक्षांतर करण्यासाठी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. अनेकांना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने प्रभावित केले आहे.