बेंगळुरू – जेडीएस म्हणजेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर आणि स्वतंत्रपणे लढेल, असे या पक्षाचे प्रमुख माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी म्हटले आहे. देवेगौडा यांनी भाजपप्रणित एनडीएशी निवडणूक युती होण्याची शक्यता फेटाळून लावली. जेडीएस हा स्वतंत्रपणे लढला तर हा पक्ष कॉंग्रेसला मिळणाऱ्या मतांचा वाटेकरी होऊ शकतो त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनाच त्याचा लाभ होऊ शकतो असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे देवेगौडा यांचा हा निर्णय अंतिमत: भाजपच्याच लाभाचा ठरणार आहे अशा अटकळी बांधल्या जात आहेत.
देवेगौडा यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, आमचा पक्ष विविध मुद्द्यांवर भाजपसोबत एकत्र काम करेल, पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर देवागौडा यांनी हा निर्णय घोषित केला आहे.त्यामुळे या पक्षाच्या अचानक बदलेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेगौडा म्हणाले की, आम्ही पाच, सहा, तीन, दोन किंवा एक जागा जरी जिंकलो तरी आम्ही लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणेच लढू”, असे ते म्हणाले. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून त्या त्या ठिकाणी उमेदवार उभे करू असे ते म्हणाले.