नवी दिल्ली – विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे इंडियन मुजाहिदीन किंवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारखीच दहशतवाद्यांचीच आघाडी आहे, अशी तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. त्याला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर तातडीने प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, तुम्ही आम्हाला काहीही म्हटले तरी आम्हीच इंडिया आहोत. आम्ही मणिपुरातील लोकांच्या जखमांवर फुंकर घालू, तेथील महिला व बालकांचे आम्हीच अश्रू पुसू. मणिपुरात आम्ही शांतता आणि सद्भावना निर्माण करू आणि त्या राज्यांतील सर्व लोकांना प्रेम देऊ. आम्हीच मणिपूरमध्ये आयडिया ऑफ इंडियाची पुनर्बांधणी करू, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले आहे.
मोदींच्या कोणत्याही वक्तव्यावर राहुल गांधी यांनी तातडीने प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अन्यथा पंतप्रधानांच्या वक्तव्यावर दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसकडून एखादी प्रतिक्रिया दिली जाते. पण यावेळी मात्र थेट राहुल गांधी यांनी प्रथमच तातडीने मोदींच्या वक्तव्यावर प्रत्त्युत्तर नोंदवले आहे.