नवी दिल्ली – जपानच्या रिझर्व्ह बँकेने आठ वर्षानंतर प्रथमच आपले मुख्य व्याजदर शून्य टक्केपेक्षा जास्त करून 0.1% इतके केले आहेत. ही व्याजदर वाढ अत्यल्प आहे. त्यामुळे त्याचा भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र ज्या कंपन्यांनी जपानकडून कर्ज घेतले आहे त्यांच्या कर्जाचा हप्ता वाढू शकतो.
त्याचबरोबर नवीन कर्जाचा हप्ता त्या प्रमाणात वाढू शकतो असे मत विश्लेषकानी व्यक्त केले आहे. मुळात व्याजदरवाढ अत्यल्प आहे. त्यामुळे त्याचा कंपन्यावर फारसा परिणाम होणार नाही असे बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की जपानमधील अर्थव्यवस्था पाहता जपानच्या रिझर्व्ह बँकेला काही प्रमाणात व्याजदर वाढ करणे गरजेचे आहे.
मात्र जपानमध्ये परंपरेनुसार व्याजदर जास्त नसतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर जपानची बँक पुन्हा व्याजदरात कपात करू शकते असे समजले जात आहे. जपान आणि भारताचे संबंध उत्तम आहे. त्याचबरोबर भारतातील कंपन्या आणि जपान मधील कंपन्यांचे संबंध उत्तम आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बर्याच कंपन्यांनी त्याबरोबरच सरकारच्या विविध विभागांनी जपानकडून बरेच कर्ज घेतलेले आहे. या कर्जाचा हप्ता काही प्रमाणात वाढू शकतो.
मात्र त्याचा जास्त नकारात्मक परिणाम भारतावर होण्याची शक्यता कमी आहे असे जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्ही के विजयकुमार यांनी सांगितले. युरोप आणि अमेरिकेतील व्याजदर जपानपेक्षा कितीतरी जास्त आहेत. यामुळे भारतातील कंपन्या जपानकडून कर्ज घेण्यासच प्राधान्य देऊ शकतील असे समजले जाता आहे.
भारतातील व्याजदर तब्बल साडेसहा टक्के आहे. त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. मात्र जपानने आणखी व्याज दारात वाढ केली तर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण असे शक्य होणार नाही. कारण जपानने व्याजदरात वाढ केल्यानंतर येन वधारण्याऐवजी घसरला आहे.
दरम्यान अमेरिका आणि युरोपमधील व्याजदरवाडेमुळे भारतात येणार्या भांडवलावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे अमेरिकेने व्याजदरात कपात करावी अशी भारतातील कंपन्यांची इच्छा आहे. मात्र जोपर्यंत अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुधारत नाही आणि महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत व्याजदरात कपात करणे बरोबर होणार नाही असे अमेरिकेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे पत धोरण बुधवारी उशिरा जाहीर होणार आहे.