मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक (Indian stock market) सध्या इतर देशापेक्षा उच्चांकी पातळीवर आहेत. त्याचबरोबर कंपन्यांचे बाजार मूल्यही बरेच उच्च पातळीवर आहे. कारण परदेशातील गुंतवणूकदारांचा भारतावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे. यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत असे शेअर बाजार नियंत्रक सेबीच्या अध्यक्षा मधाबी पुरी बुच ( Madhabi Puri Buch) यांनी म्हटले आहे.
भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या कंपनी सुशासन या विषयावरील परिषदेत बोलताना मदाबी पुरी बुच यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजारात किमतीचे नफ्याशी प्रमाण 22.2 इतके आहे. ते आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. हे प्रमाण जगातील इतर कोणत्याही शेअर बाजारापेक्षा जास्त आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्था बळकट आहे आणि आगामी काळात ती अधिक परतावात देऊ शकेल असे परदेशी गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळेच आशावादाच्या आधारावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. यामध्ये जास्त शंका घेण्यासारखे फारसे काही नाही असे त्यांनी सुचित केले.
जगातील काही तज्ञ भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्यामुळे चिंता व्यक्त करत आहेत. असे असले तरी मग भारतात गुंतवणूक का होत आहे असे त्या म्हणाल्या. त्यांनी असे सांगितले की, भारताबाबत लोक आशावादी आहेत. या कारणामुळे भारतामध्ये परकीय गुंतवणुक येत आहे आणि निर्देशांक उच्च पातळीवर स्थिर आहेत.
विशेष म्हणजे काही आठवड्यापुर्वी बुच यांनी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहेत. त्यातल्या त्यात मिडकॅप आणि स्मॉल कॅप जास्त फुगले आहेत असे सूचित केले होते आणि गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले होते. आज त्यांनी सांगितले की, आपण परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराबरोबर नेहमी चर्चा करत असतो आणि या गुंतवणूकदारांना भारताबाबतचा आशावाद वाढला आहे. त्यामुळे हे गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करीत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निर्देशांक उच्च पातळीवर असूनही ते स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतात जीएसटी संकलन वाढत आहे. प्रत्यक्ष कर संकलन वाढत आहे. आगाऊ कर भरणा वाढत आहे. ऊर्जा निर्मिती आणि वापर वाढत आहे. त्याचबरोबर टोल संकलन वाढत आहे. या सर्व बाबी भारताचा विकासदर वेगाने वाढणार असल्याचे स्पष्ट करीत आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास वाढणे साहजिक आहे.
कंपन्याचे बाजारमूल्य वाढले
दहा वर्षांपूर्वी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 74 लाख कोटी होते. दहा वर्षानंतर ते आता 378 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. सध्या कंपन्यांचे बाजार मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाइतके असल्याचे त्यांनी सांगितले.सरलेल्या वर्षात भारतीय कंपन्यांनी शेअर बाजारातून 10.5 लाख कोटी रुपये केले. आता कर्जरोख्यातून मिळालेली रक्कम बँकांनी दिलेल्या एकूण कर्जाच्या 62% इतकी झाली आहे. यावरून कर्जरोखे बजार विस्तारत असल्याचे दिसून येते.