छत्रपती संभाजीनगर- शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार असुन, तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील असल्याने कायदा आणि सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार शहरात पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहे.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 4 जुलै ते 18 जुलैपर्यंत हे आदेश लागू असणार आहे. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव हत्ये प्रकरणावरुन दलित समाजामध्ये असंतोष असून, त्या अनुषंगाने विविध दलित संघटना यांच्याकडुन धरणे, मोर्चे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. तर गायरान जमीन नावावर करण्यात यावी या मागणीकरीता विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्या वतीने धरणे, निदर्शने, मोर्चा इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने त्यास मुस्लीम तसेच इतर राजकीय पक्ष, संघटनांचा विरोध असुन त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण मिळावे त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
औद्योगिक तसेच इतर संघटीत-असंघटीत कामगार संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशिल असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी म्हणुन जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.