देशात मोठ्या घातपाताचा कट : 15 शहरांमध्ये हाय अलर्ट जारी
नवी दिल्ली : आज साजरा करण्यात येत असलेला मुस्लिम बांधवांचा सण बकरी ईदवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या दिवशी देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने गुप्तचर यंत्रणेमधील सुत्राच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले आहेत. बकरी ईद आणि स्वतंत्र्य दिनाला हे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरसह देशातील इतर भागातही दहशतवादी हल्ले होऊ शकतात असे आयबीने राज्य पोलिसांना सुचीत केले आहे. त्यानुसार देशातील मोठ्या 15 शहरांमध्ये हाय अलर्ट जारी कदण्यात आला आहे. इस्लामिक स्टेट किंवा आयएसआयचा पाठिंबा असलेले दहशतवादी गर्दीच्या ठिकाणावर हल्ला करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खांनी यांनी स्वतः पुलवामासारख्या हल्ल्याची भीती यापूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी एकापाठोपाठ ट्विट करत आगपाखड केली. त्याच पार्श्वभूमीवर देशात मोठा घातपात होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.