नवी दिल्ली – भारताच्या आर्थिक विकासाच्या गतीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आर्थिक विकासाचा अर्थ कृषि क्षेत्रापासून उद्योगांपर्यंत तसेच सेवाक्षेत्र आणि रोजगारांचे विविधीकरण असा होतो. यापूर्वीच्या डॉ. मनमोहन सिंग सरकारने त्या दिशेने जी प्रगती साधली होती ती आताच्या सरकारने पुन्हा उलट दिशेने नेली आहे अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.
एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी लिहिले आहे की वर्ष २००४-०५ आणि २०१७-१८ या काळात भारतातील कृषि क्षेत्रातील श्रमिकांच्या संख्येत ६.७ कोटींची घट झाली होती. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील जादा वेतनाच्या कामांसाठी कृषि क्षेत्रातील कमी वेतनाचे काम श्रमिकांनी सोडल्यामुळेच ही घट झाली होती.
ही एक ऐतिहासिक कामगिरी होती. भारताला मध्यम उत्पन्नाचा देश बनवण्याच्या दिशेने हे महत्वाचे योगदान होते. मात्र मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशाने जे काही साध्य केले, प्रगती केली ती मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या अन्याय काळात पूर्णपणे उलटली आहे. २०१८-१९ नंतर कृषि क्षेत्रातील श्रमिकांची संख्या पुन्हा ६ कोटींनी वाढली आहे. कोविड- १९ च्या अगोदरपासून याची सुरूवात झाली होती.
जयराम रमेश पुढे म्हणाले आर्थिक विकासाचा अर्थ कृषि क्षेत्र, उद्योग, सेवा अशा प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवणे असा आहे. जगातले सगळेच देश हा क्रम अनुसरतात. भारताला समृध्दीच्या मार्गावरून घेऊन जाण्याऐवजी पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि गैरव्यवस्थापनामुळे आपल्या आर्थिक सुधारणांना पुन्हा २० वर्षे मागे नेले आहे.