जयपूर : राजस्थानच्या राजधानी जयपूर येथे १३ मे २००८ रोजी झालेल्या आठ बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या चार दहशतवाद्यांना शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.
हे चारही दहशतवादी यूपीमधील आजमगडमधील आहेत. १८ डिसेंबर रोजी जयपूर विशेष कोर्टाने जयपूर बॉम्ब स्फोटात चौघांना दोषी ठरवले होते. १९ डिसेंबर रोजी त्याच्या शिक्षेवर चर्चा झाली. आणि २० डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी 4 वाजता विशेष कोर्टाच्या न्यायाधीशांनी दोषी सरवर आझमी, मोहम्मद सैफ, सैफूर रहमान आणि सलमान यांना फाशीची शिक्षा सुनावली.
तत्पूर्वी, शिक्षा सुनावण्याच्या मुद्द्यांवरील सुनावणीदरम्यान, आरोपीचे वकील पैकर फारुख यांनी त्यांचे वय, शिक्षा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून शिक्षा देण्याची विनंती केली . तर दुसरीकडे, राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील श्रीचंद यांनी दहशतवाद्यांना फाशी देण्याची मागणी केली होती.