धनबाद – माओवादी नक्षलवादी नेते प्रशांत बोस आणि त्यांची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारत बंदची हाक दिली आहे. यादरम्यान झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी रेल्वेला लक्ष्य केले आहे. 12 तासांत नक्षलवाद्यांनी दोन मोठ्या घटना घडवून आणल्या आहेत. झारखंडमधील धनबादमध्ये रेल्वे ट्रॅक बॉम्बस्फोटाने उडवून दिला आहे. या घटनेनंतर इंजिन रुळावरून घसरले आहे. त्याचवेळी लातेहारमध्येही माओवाद्यांनी ट्रॅक उडवून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी ही घटना घडवली आहे. दिलासादायक बाब ही की या या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासन पोहोचले आहे.रेल्वे ट्रॅक सुधारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला होता.
माओवादीचे सदस्य आणि एक कोटीचे इनाम अससेले नक्षलवादी प्रशांत बोस आणि त्यांची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी 19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान भारत बंदची घोषणा केली आहे. नक्षलवाद्यांनी तोरी रिचुघुता डेम स्टेशनचा रेल्वे ट्रॅक उडवून दिला, त्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या सोबतच राज्यभरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.