पुणे – अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र येमेनकडे सरकत असल्याने त्याचा प्रभाव शुक्रवारपासून कमी होईल. हे क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल.
राज्यातील ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मंगळवारी ढगाळ हवामान होते. त्यामुळे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हवामान कोरडे असल्याने किंचित गारठा जाणवत आहे. पुणे शहरातही किमान तापमानात वाढ होऊन ते 19.6 अंशांपर्यंत पोहोचले.
चक्रीवादळांमुळे पावसाची शक्यता
अरबी समुद्रामध्ये “पवन’ आणि “अम्फन’ हे दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या चोवीस तासांत ही चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ही वादळे सक्रिय झाली तर, मुंबई, पुणे आणि नाशिक भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.