कोरेगाव भीमा 1 जानेवारी 2018 दंगल प्रकरण
शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील आंदोलनावेळी तत्कालीन भाजप सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याकडे केली होती. त्यापाठोपाठ आता याप्रकरणी नोंदविण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत कोरेगाव भीमा येथील आंदोलनातील खोटे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती, नुकतेच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र देत वढू व परिसरात झालेल्या दंगलीप्रकरणी भाजपा सरकारकडून अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध हेतूपरस्पर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे काही कार्यकर्ते अटकेत आहेत. काहींना न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांचा छळ केला जात असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. भाजप सरकारच्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या नागरिकांना न्याय देण्याची मागणी करीत दंगलीप्रकरणी अनेक बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व निरापराध नागरिकांना नक्षलवादी ठरवून त्याच्यावर भरलेले खटले तत्काळ मागे घेण्याची विनंती केली आहे.