नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात पाकिस्तानमधून आपल्या प्रेमासाठी आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाने चर्चा रंगली आहे. मात्र सुरुवातीला प्रेमासाठी देश सोडून आलेल्या सीमाविषयी सर्वाना कुतूहल वाटले परंतु आता सीमाचे पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या गुप्तहेर संघटनांशी संबंध असल्याचा संशय बळावत चालला आहे.
नुकतीच तिची एटीएसकडून १२ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रेमप्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे कारण सीमा हैदरचे नाव घेत देशात पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
या धमकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सध्या तिच्या बद्दल अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत. अश्यातच एक महत्वाची माहिती हाती लागली असून, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सीमा हैदर हिने अत्यंत काळजीपूर्वक उत्तर भारतातील महिलांचा पेहराव केला होता. तसेच सुरक्षा दलांची नजर चुकविण्यासाठी तिने तिच्या मुलांनाही अशाच प्रकारचे कपडे घातले होते. मानवी तस्करीतून भारत- नेपाळ सीमा ओलांडताना महिलांना विशेषत: घरगुती मोलकरणी वाटावे, असेच कपडे घालण्याची ही पद्धत वापरली जाते.
हे सर्व करण्यासाठी तिने स्थानिक व्यावसायिकांची मदत घेतली असावी, असं गुप्तचर सूत्रांचं म्हणणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. सीमा हैदर ही १३ मे २०२३ रोजी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात आली असल्याचं सांगितलं जात आहे.
सीमा आणि सचिन यांनी नेपाळच्या पशुनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. यावरून सीमा आणि सचिन खोटं बोलत असल्याचं सत्य बाहेर आलं आहे. एवढंच नाही तर आतापर्यंतच्या एटीएस तपासात अनेक बाबीवरून पडदा उघडला असून सीमा अनेक बाबतीत खोटं बोलल्याचं तपासात आढळलं आहे. यूपी पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाकडून दोघांची (एटीएस) चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानी सीमा हैदरने दावा केला होती की, तिने सचिनसोबत नेपाळमधील पशूपतीनाथ मंदिरात लग्न केलं. पण, पशूपतीनाथ मंदिरामध्ये विवाह होऊ शकत नसल्याचं तपासात समोर आलं आहे. सचिनने सांगितलं होतं की, तो नेपाळमधील हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र, तपासात तो खोट्या नावाने या हॉटेलमध्ये थांबल्याचं आढळून आलं.
सीमा-सचिनने जामिनासाठीही कोर्टात खोटं बोलल्याचा आरोप आहे. सीमा हैदरने नेपाळ सीमेवरून एंट्री कशी घेतली याबद्दल खोटी माहिती दिली आहे. सीमाने पाकिस्तानातील तिच्या पतीला खोटे सांगितले की, ती तिच्या गावी जात आहे, तर तिथून ती दुबईला गेली आणि नंतर पुन्हा ती पाकिस्तानमधून भारतात आली. पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिनची लव्हस्टोरी पबजी गेममुळे सुरु झाली होती.