मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आज 27 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. तब्बल महिनाभर या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या एक दिवस आधी आयोजित केलेल्या पारंपारिक चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून, ‘दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असलेले लोक समोर आले नाहीत हे चांगले आहे’. अशी घणाघाती टीका देखील केली आहे.
सोमवार पासून सुरू झालेले राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी रविवारी सरकारने आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “एकप्रकारे विरोधी पक्ष चहासाठी आला नाही हे चांगले आहे कारण त्यांच्यापैकी काहींचे दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. आमच्या युतीला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याऐवजी तुम्ही या लोकांना देशद्रोही म्हणणार नाही का? असं ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे उघडपणे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा संदर्भ देत असल्याचं दिसून आलं, जे दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी अटक झाल्यानंतर तुरुंगात आहेत. तसेच, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
ते म्हणाले, “मी निष्ठा बदलली असे अजित पवार सांगत आहेत, पण बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालत आहे, हे त्यांनी विसरू नये. निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण देण्याच्या निर्णयावरूनही हे सिद्ध झाले आहे.’ असं देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.