कोलकता – पुढील लोकसभा निवडणूक भाजपसाठी अनुकूल असल्याचा विचार करणे चुकीचे ठरेल. त्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्वाची ठरेल, असे भाष्य नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.
भाजपने भारताची दूरदृष्टी कमी केली आहे.
हिंदू भारत आणि हिंदीभाषिक भारत एवढ्यापुरतीच त्या पक्षाने भारताविषयीची जाणीव मर्यादित केली आहे. भाजप शक्तिशाली वाटत असला तरी त्या पक्षात कमजोरीही आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी खरोखरीच प्रयत्न केल्यास ते भाजपला टक्कर देऊ शकतात, असे सेन यांनी म्हटले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील पंतप्रधान होऊ शकतात का, असा प्रश्न सेन यांना विचारण्यात आला.
ममतांमध्ये निश्चितच क्षमता आहे. पण, भाजपविषयी जनतेत असलेल्या नाराजीचे रूपांतर त्या ताकदीमध्ये करू शकतात का यावर बरेच काही अवलंबून आहे, असे उत्तर त्यांनी दिले. सेन यांनी कॉंग्रेसविषयीही मत मांडले. कॉंग्रेस पक्ष बराच दुबळा झाल्याचे दिसते. त्यामुळे त्या पक्षावर कोण किती विसंबून राहील ते सांगता येऊ शकत नाही. त्या पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजीही आहे. तसे असले तरी कॉंग्रेसकडे देशव्यापी दृष्टीकोन आहे. तो इतर कुणीच हिरावू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.