मुंबई – सरकारला ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जातात, असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
याशिवाय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याची आरोपही त्यांनी केला. युवासेनेकडून ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते. त्यावेळी दिशा सॅलियन एसआयटी चौकशी होण्याच्या शक्यतेवरून ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर होत आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील. पण घाबरू नका ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला.
मुंबई, महाराष्ट्राची लूट सुरू आहे. मुंबईतले दहिसर ,वरळी आणि इतर असे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत हे सरकार आणि प्रशासन आम्हाला उत्तर देत नाहीत तर केवळ दिल्लीला उत्तर देत आहेत. पालिकेला आम्ही प्रश्न विचारते मात्र ते उत्तर देत नाहीत.
हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेऊ, पुढील लढाई कोर्टात नेऊ. आमचे सरकार असताना प्रत्येक प्रकल्प संदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो चर्चा करायचो, प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो. मात्र या सरकारने खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले आहेत, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केली आहे.
सरकार गुजरातच्या हिताचे
अधिवेशन आल की असे ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचे आणि रेटून बोलायची त्यांची सवय आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही गुजरातच्या हिताचे आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.