आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ अशी सार्थ ओळख प्राप्त केलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात अद्याप एकही सामना जिंकता येऊ नये याचे आश्चर्य वाटते. नक्की मुंबई संघाला झाले तरी काय, असा प्रश्न सहज मनात उभा राहतो.
या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणारा हा संघ आज एखाद्या क्लब दर्जाच्या संघासारखा सुमार कामगिरी करत आहे. विजय आणि पराभव हा खेळाचाच एक भाग असतो हे मान्य, पण ज्या पद्धतीने मुंबईचा संघ हारत आहे ते पाहून हाच तो विजेतेपद पटकावणारा संघ आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
खरेतर खेळाडू पाहिले तर यंदाच्या मोसमात त्यांच्या संघात 80 टक्के खेळाडू तेच आहेत; मग तरीही असे का होत आहे. कर्णधार रोहित शर्मा तर नवख्या फलंदाजासारखा खेळपट्टीवर दिसून येतो. ना त्याचे पाय चेंडूपर्यंत येतात, त्याचे डोकेही स्थिर नसते, त्याचे टायमिंगही चुकत आहे. एखादा चेंडू बॅकफूटला खेळायचा की फ्रंटफूटवर ते ठरवण्यात तसेच त्या चेंडूवर शॉट सिलेक्शनही चुकत आहे. आणि हे एकाच सामन्यात नव्हे तर त्यांनी गमावलेल्या आठही सामन्यांत दिसून आले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या संघाचा मेंटॉर आहे व तोदेखील या परिस्थितीतून संघाला बाहेर कसा काढू शकत नाही हे देखील एक कोडेच आहे. रोहित इनसाइड आऊट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत आहे जे त्याने यापूर्वी कधी केले नव्हते.
एकतर मुंबईचे फलंदाज स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, ग्लान्स व ऑन ड्राइव्ह मारण्यात माहीर असतात. मुळातच मुंबईच्याच नव्हे तर भारतीय फलंदाजांना पायावर चेंडू टाकणे म्हणजे गोलंदाजाने आत्महत्या करण्यासारखे असते असे जागतिक क्रिकेटमध्ये बोलले जाते. जे सचिनने संपूर्ण कारकिर्दीत करून दाखवले ते रोहितला आता का जमत नाही. रोहितला एकेका धावेसाठी झगडताना पाहून त्रास होतो. जे रोहितचे तेच पोलार्ड, इशान किशनसह अन्य प्रमुख फलंदाजांबाबत घडताना दिसत आहे.
गोलंदाजाबाबत तर काय बोलावे हाच प्रश्न आहे. सर्वात प्रमुख अस्त्र असलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह सपशेल अपयशी ठरला आहे. त्याच्यासह जयदेव उनाडकट हा देखील एक अनुभवी गोलंदाज, पण हे दोघे यंदाच्या स्पर्धेत अशी गोलंदाजी करत आहेत की जणू पहिल्यांदाच गोलंदाजी करत आहेत.
एखादा सामना गमावला तर समजू शकतो, पण आठ सामने गमवायचे ते देखील हाराकिरी पत्करून हे मात्र पटत नाही. निश्चितच काहीतरी घोळ आहे. एकतर रोहितला नेतृत्वाचा कंटाळा आलाय किंवा सतत व अति क्रिकेट खेळण्याचाच हा परिणाम आहे. आता किमान उरलेल्या सामन्यांतून प्लेऑफ गाठता येणार नसले तरीही प्रतिष्ठा मात्र निश्चितच जपता येईल.