वाई – समाजात सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासन कसोशीने करत आहे. सण हे आनंदासाठी असतात आणि त्यांचे पावित्र्य, चांगल्या गोष्टी जपून त्या भावी पिढीत पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्सव काळात सर्वांनी शांतता व सलोखा राखत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी केले.
आगामी काळातील गणेशोत्सव व ईदच्या निमित्ताने समाजात सुव्यवस्था रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने वाईच्या पंचायत समितीच्या सभागृहात सर्व मंडळांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. बांगर बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची प्रमुख उवस्थिती होती.श्री. बांगर पुढे म्हणाले, वाई तालुक्यातील जनतेचा एकोपा जिल्ह्याला मार्गदर्शक आहे.
वाईमधून शांतता समितीच्या बैठकांची सुरुवात आज करीत आहोत. चुकीच्या पद्धतीने सोशल मीडिया वापरु नये. विशेष करून युवकांनी सोशल मीडिया वापरताना भावनिक होऊन कोणतीच पोस्ट करू नये. यावेळी ऍडमिनने ग्रुपवर लक्ष ठेवावे व कोणाची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी.
कळत नकळत अशा गोष्टींमुळे आपण आरोपीच्या चौकटीमध्ये येतो. चांगले उपक्रम राबवून मंडळांनी एक आदर्श निर्माण करावा व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटी देण्यास सांगावे. वाई, भुईंजमधील चोऱ्यांप्रकरणी संशयितांना पकडले असून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, काशिनाथ शेलार, विक्रम वाघ, स्वप्नील गायकवाड, सचिन फरांदे, भारत खामकर, दिलीप हगीर, महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्यां यांनी काही सूचना मांडल्या. पुसेसावळी येथील घटनेच्या पोलीस प्रशासनाने योग्य प्रकारे परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलीस दलाचे कौतुक करण्यात आले.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी आभार मानले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, कृष्णा पवार, दीपक ओसवाल, चरण गायकवाड, युसूफ बागवान, यांच्यासह अनेक मंडळाचे पदाधिकारी, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
काही अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण इंटरनेट सेवा बंद न करता सोशल नेटवर्किंग साईट बंद कराव्यात, किसनवीर महाविद्यालयाजवळ पोलीस चौकी उभारावी, दारू दुकानांसमोर होणाऱ्या ट्रॅफिकची व्यवस्था करावी, पोलीस प्रशासन व प्रमुख कार्यकर्त्यांनी मंडळांना भेटी द्याव्यात, वाई पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, किरकोळ भांडणांना राजकीय किंवा जातीय रंग मिळू नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी जबाबदारी उचलावी, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सामाजिक प्रबोधन व्हावे, मंडळातील कार्यकर्त्यांनी सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर करून वेगळा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.