भारतीय क्रिकेट संघात एक कुलदीपक तयार झाला आहे. खरेतर त्याचे नावच कुलदीप आहे; परंतु सध्याच्या संघातील तोच सर्वांत भरंवशाचा फिरकी गोलंदाज वाटू लागला आहे. म्हणूनच कुलदीप यादवच्या जागी “कुलदीपक’ म्हणावेसे वाटते. आशिया करंडक स्पर्धा ही त्याच्यासाठी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी तर आहेच; परंतु पुढील किमान तीन वर्षे त्याचे संघातील स्थानही निश्चित होण्याची सुवर्णसंधी आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी भारताची फिरकी गोलंदाजीवर मक्तेदारी होती. हा वारसा अगदी अनिल कुंबळे व हरभजनसिंग यांनीही जपला. कारण आजच्या क्रिकेटमध्ये सलग दहा वर्षे एखादा खेळाडू संघाचा भाग बनल्याची उदाहरणे खूपच कमी आहेत. त्यातच फिरकी गोलंदाजीमध्ये सध्या भारतीय संघात जी स्पर्धा आहे ती पाहता कुलदीपने पुढील किमान तीन वर्षे जरी भारतीय संघातून सरस कामगिरी केली तर त्याच्याही नावापुढे महान फिरकी गोलंदाज अशी बिरुदावली येईल यात शंका नाही.
आशिय करंडक स्पर्धेतील सुपर फोर गटात त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर ज्या पद्धतीने नाचवले ते पाहून शेन वॉर्नचीच आठवण आली. भले तो डवखुरा चायनामन गोलंदाज नव्हता म्हणून कुलदीपच्या कामगिरीला त्याचे उदाहरण देत तुलना करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, भरात असताना समोर कोणताही संघ असो त्याची त्रेधा उडवण्याची क्षमता कुलदीपच्या गोलंदाजीत वॉर्नची झलक दाखवणारी होती हे, मात्र खरे.
कुलदीप 2.0
कुलदीपची कारकीर्द अद्याप कुठे बहरत आहे. लगेच त्याची अन्य कोणत्या गोलंदाजाशी तुलना करणे योग्य नाही मात्र, त्याची वाटचाल सामान्य फिरकी गोलंदाज ते महान चायनामन गोलंदाज अशी सुरु झाली आहे. 2017 साली त्याने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून यजुर्वेंद्र चहल व कुलदीप यांनी भारताच्या फिरकी गोलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेतली व सरस कामगिरी केली. मात्र, त्यावेळी कुलदीपच्या गोलंदाजीत काही उणिवा होत्या. त्याच्याकडे रॉंगवन नव्हता, स्ट्रेटरवन, आर्मर, फ्लिपर ही अस्त्रे नव्हती. त्याचे संघातील स्थानही तसे निश्चित नव्हते. रवींद्र जडेजा व चहल यांच्यावरच निवड समिती भर देत होती व कुलदीपकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. खरेतर विराट कोहली कर्णधार असताना कुलदीप संघात असायचा. रोहित कर्णधार झाल्यावर हे चित्र सुरुवातीला दिसले नाही. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका, तसेच आताची आशिया करंडक स्पर्धा कुलदीपचा पुनर्जन्म झाल्याचे दिसून आले म्हणून हा “कुलदीप 2.0′ आहे असे दिसते.
शैलीतील बदल निर्णायक ठरला
यंदाच्या मोसमात कुलदीपने खेळलेल्या 14 एकदिवसीय सामन्यांतून तब्बल 27 बळी मिळवले आहेत. हीच त्याच्या नव्या जन्माची आकडेवारी आहे. त्याच्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रीयेनंतर त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. बरा झाल्यावर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सरावाला प्रारंभ केला. त्यात अकादमीचे फिजीओ आशिष कौशिक यांचे त्याला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या गोलंदाजीचे अवलोकन करताना त्यांच्या असे लक्षात आले की तो चेंडू रिलीज करताना उजव्या गुडघ्यावर जास्त भार देत आहे. तसेच “अवे फ्रॉम द बॉडी’ त्याचा हात फिरतो व त्यानंतर चेंडू रिलीज होतो. त्यांनी त्याला यातच अनेक सुधारणा सुचवल्या. त्याचा रनअपही तिरपा होता तो सरळ करायला सांगितला. हातही शरीराच्या जास्तीत जास्त जवळून आणायला सांगितले. रनअप कमी करुन उजव्या गुडघ्यावर जास्त वजन न टाकता चेंडू रिलीज करण्यास सुचवले. कुलदीपने नेटमध्ये हे सगळे बदल करण्यास प्रारंभ केला व आजचा 2.0 कुलदीप सातत्याने यशस्वी ठरताना दिसत आहे.
प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीचा एक ऱ्हिदम असतो तसा कुलदीपचाही आहे. तो रनअप घेताना सावकाश येतो व क्रीझजवळ आल्यावर उसळी घेत डाव्या हाताने रिटर्न क्रीझचाही वापर करत एक नैसर्गिक अँगल मिळवतो व मगच चेंडू रिलीज करतो. यामुळे समोरचा फलंदाज गोंधळात पडतो की चेंडू बाहेर जाणार आहे की आत येणार आहे. तसेच चेंडू 87 ते 90 किलोमीटर वेगाने टाकतानाही कुलदीप चेंडूला बिनदिक्कतपणे फ्लाइटही देण्याचे धाडस करतो. हेच धाडस आता त्याचे प्रभावी अस्त्र बनले आहे.
पूर्वी कुलदीप स्टार्ट घेताना वेगात घ्यायचा व चेंडूही जास्त वेगाने रिलीज करण्याचा प्रयत्न करायचा इथेच तो चुकत होता. प्रत्येक चेंडू वेगात टाकला की त्याच्या फिरकीवर फलंदाज बाद होतील हा समज खोटा ठरलेला त्यानेच अनुभवला व चेंडूची गती कमी करून त्याबाबतचा सस्पेन्स कायम राखण्यात तो आता यशस्वी होताना दिसत आहे. शैलीतील हा बदल त्याच्यासह संपूर्ण संघासाठी लाभदायक ठरताना दिसत आहे.
अपयशातून यशाकडे
आयपीएल स्पर्धेत त्याने सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळ केला. काही वर्षांतच त्याला संघातून रिलीज केले गेले. तसेच त्याचे सुमार कामगिरीमुळे भारतीय संघातील स्थानही गेले. देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्याची कामगिरी फारशी समाधानकारक होत नव्हती. 2021 ते 2023 हा काळ त्याच्यासाटी अत्यंत वेदनादायी होता. त्याने जीतकी मेहनत घेतली त्यात कशातच त्याला यश येत नव्हते. संघात चहलसह अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर ही नावेही समोर येत होती. त्याचवेळी अकादमीत त्याने अथक मेहनत केली, शैलीत सुधारणा केली.
तांत्रिक बदल केले व आज हाच कुलदीप भारताच्या फिरकी गोलंदाजीचे सर्वात मोठे अस्त्र बनलेला दिसत आहे. त्याच्या नव्या शैलीचय गोलंदाजीसमोर भले भले फलंदाज गारद होताना दिसत आहेत. मात्र जेव्ह हा बदल त्याने केला तेव्हा त्यालाच यावर टिकण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. सहा सात सामने खेळल्यावर त्याला ऱ्हिदम मिळवता आला व आज त्याच्याच गोलंदाजीसमोर जागतिक दर्जाचे फलंदाज नांगी टाकताना दिसत आहेत.
चेंज ऑफ पेसची कमाल
आताच्या काळात जवळपास प्रत्येक गोलंदाज चेंज ऑफ पेस यावर जास्त विश्वास ठेवत गोलंदाजी करतो. कुलदीपही हेच करत आहे. षटकातील पहिले तीन चार चेंडू वेगाने टाकायचे व एक चेंडू धीम्या गतीने टाकायचा. यावर फलंदाज गोंधळून जातो व आपली विकेट गमावून बसतो. रॉंग वन हे नवे अस्त्र कुलदीपच्या भात्यात आले आहे. वेस्ट इंडिजमध्ये त्यावर जास्त प्रभावी दिसला नाही परंतु आशिया करंडकात त्याने कमाल केली. पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजांना त्याने जेरीस आणले. त्याच्या कामगिरीतील ही दोन अस्त्रेच त्याला येत्या काळात जास्तीत जास्त बळी मिळवून देतील यात शंका नाही.
चेंज ऑफ पेस किंवा नक्कल बॉल सध्याच्या गोलंदाजांचे हुकमी अस्त्र ठरत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने हे सगळ्यात आधी शोधले व त्यानंतर अनेक गोलंदाज त्याचे अनुकरण करू लागले. आपला जसप्रीत बुमराह व महंमद शमीही याचा वापर करत यशस्वी ठरले आहेत. फिरकीच्या बाबतीत अनिल कुंबळे प्रयोगशील होता त्यानेही या प्रकारच्या चेंडूंचा खुबीने वापर करत त्या काळात ब्रायन लारा, इंझमाम उल हक, रीकी पॉंटिंग, जॅक कॅलिस, स्टीव्ह वॉसारख्या फिरकीवर चांगली फलंदाजी करत असलेल्या फलंदाजांना नामोहरम केले होते. आता हाच वारसा कुलदीप नेटाने चालवताना दिसत आहे.
विश्वकरंडक स्पर्धेतील हुकमी एक्का
भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. आता स्पर्धाच भारतात होणार म्हटल्यावर आपल्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचेच वर्चस्व राहणार हे वेगळे सांगायला नको. कुलदीपसाठी ही नामी संधी आहे की त्याने जर या स्पर्धेत धुमाकुळ घातला तर येत्या काळात तो भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज ठरेल. रवींद्र जडेजा देखील सरस आहे मात्र, आशिया करंडक स्पर्धेत जडेजालाही खेळपट्टीची मदत मिळत होती, मात्र, बळी फारसे मिळवता आले नाहीत. हाच परिपूर्ण फिरकी गोलंदाज ते पार्टटाइम फिरकी गोलंदाज यातील फरक आहे. मागे एकदा कपील देव म्हणाले होते, आपल्याला चांगल्या गोलंदाजाची नव्हे तर महान गोलंदाजाची गरज आहे. त्यांचे म्हणणे काही प्रमाणात का होईल; पण कुलदीप खरे करेल असा विश्वास आहे.
अमित डोंगरे