कराची – विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला कसोटी संघाचा कर्णधार बनवले जाईल, असे वाटत नाही. याची शक्यता फारच कमी आहे, असे मत पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बट्टने म्हटले आहे. जर असे झाले, तर दोन्ही खेळाडूंमध्ये सर्व काही ठीक नाही, असे प्रत्येकाला नक्कीच वाटेल, असेही सलमानने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या वृत्ताने गोंधळ निर्माण केला होता. कोहलीच्या जागी रोहितला एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर रोहितशी मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण कोहलीने हे वृत्त फेटाळून लावले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी माझ्यात आणि रोहितमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले.
माझ्यात आणि रोहितमध्ये काहीही वाद नाहीत. गेल्या अडीच वर्षांपासून मी हेच सांगत आहे आणि हे सर्व सांगून मी आता थकलो आहे. मी जे काही करेन किंवा मला करायचे असेल, यामुळे संघाचे कधीही नुकसान होणार नाही आणि संघाला कधीही निराश होऊ देणार नाही. रोहितला माझा पूर्ण पाठिंबा असेल, असे कोहली म्हणाला होता.
दुसरीकडे जर निवड समितीने कोहलीच्या जागी रोहितला कसोटी संघाचा कर्णधार बनवले, तर दोन्ही खेळाडूंमधील मतभेदाच्या बातम्यांना जास्त हवा मिळेल, असेही सलमान बट्टने म्हटले आहे. मला वाटत नाही की असे व्हायला हवे, त्याचा फायदा होणार नाही, पण असे होईल की नाही, हे मी सांगू शकत नाही. हे स्पष्ट आहे की, दोन खेळाडूंमध्ये कोणताही वाद नाही. ज्या कर्णधाराने तुम्हाला परदेशात सर्वात जास्त विजय मिळवून दिले आहेत, त्याला तुम्ही सहजासहजी हटवू शकत नाही, असेही तो म्हणाला.