नवी दिल्ली – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांचे विधान नुकतेच चर्चेत आले आहे. वेद हे विज्ञानाचे मूळ आहे, परंतु हे ज्ञान अरबस्तानातून पाश्चात्य देशांमध्ये पोहोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी आपल्या नावाने त्याचा प्रचार केला. असे ते म्हणाले.
एस सोमनाथ पुढे म्हणाले,’बीजगणित, वर्गमूळ, काळाची गणना, स्थापत्यशास्त्र, विश्वाचा आकार, धातूविज्ञान आणि विमान चालवणे हे वेदांमध्ये प्रथम शिकले, मात्र अडचण अशी होती की हे ज्ञान संस्कृत भाषेत होते आणि ही भाषा लिहिली जात नव्हती. लोक एकमेकांकडून ज्ञान घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. पुढे ती लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरली गेली. ते उज्जैनच्या महर्षी पाणिनी संस्कृत आणि वेद विद्यापीठात संबोधित करत होते. पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहिले.
अभियंते आणि शास्त्रज्ञांना संस्कृत खूप आवडते. ही भाषा संगणकासाठी अतिशय सोपी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ती सहज वाचू शकते. संस्कृतचा वापर गणनेत कसा करता येईल यावर बरेच संशोधन चालू आहे. ते म्हणाले की, भारतात संस्कृतमध्ये निर्माण झालेले साहित्य केवळ साहित्यिक दृष्टिकोनातूनच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. संस्कृतमधील सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक अभ्यास यात फरक नाही.