फुरसुंगी, दि. 7 (प्रतिनिधी) -हडपसर-सासवड पालखीमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून क्र. 965 आहे. मात्र, महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतरच या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात अपघातानंतर भेकराईनगर चौकात नागरिकांनी उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संबंधित प्रशासनाने या मार्गावरील खड्डे मुरूम टाकून तात्पुरते बुजविले. परंतु, पावसामुळे पुन्हा खड्डे वर आले आहेत. डबकी साचून रस्त्याची चाळण झाली आहे. हडपसर-सासवड महामहामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, सर्वत्र खड्डेच खड्डे, दगड-गोटे, चिखल, घाणपाणी, अरुंद रस्ता यामुळे खरोखरच महामार्ग आहे का? अशी शंका वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे, अशा स्थितीतही संबंधित प्रशासन गप्प आहे. सत्यपुरम ते उरुळी देवाची पोलीस चौकी दरम्यान रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी जागाच नसल्याने रस्त्याचे तळे झाले आहे.
ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने मोऱ्या बंद आहेत. यामुळे येथील खड्डे पाण्याचे भरले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यालगत अतिक्रमणे, बेशिस्त पार्कींग यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
सत्यपुरम, तुकाईदर्शन, भेकराईनगर चौक, विठ्ठल पेट्रोलियम, फुरसुंगी फाटा, रेल्वे उड्डाणपूल, मंतरवाडी चौक ते उरुळी देवाची फाटा आदी ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
या महामार्गावर गेल्या महिन्यांत 5 ते 6 निष्पाप नागरीकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतरही मार्गाचे रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.