नाशिक : औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे डंपर-खासगी बस यांच्यात झालेल्या अपघातानंतर बस पेट घेतल्याने ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणाऱ्या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मयत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलवण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.
Maharashtra | Nashik Police confirms that several people are feared to be dead as a bus caught fire in Nashik last night. Further details awaited. pic.twitter.com/s75A6RnYHO
— ANI (@ANI) October 8, 2022
या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे यांनी दिली. याशिवाय बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजले गेल्याने, त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.
यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती. सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. ११ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला. डंपरचालक फरार आहे. अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.