मुंबई :- भारतात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने आयपीएल स्पर्धेचे आयोजन देशाबाहेर केले जाऊ शकते असे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरीही ही स्पर्धा व निवडणूका एकाच वेळी येत असल्याने हा निर्णय घेतला जाऊ शकतो असेच चित्र दिसत आहे.
लोकसभा निवडणुका मार्च ते मे या कालावधीत घेतल्या गेल्या तर आयपीएल स्पर्धा देशाबाहेर आयोजित केली जाईल. मात्र, सध्या केंद्र सरकारकडून तशी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नसल्याने बीसीसीआयने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
आयपीएल स्पर्धेचा पुढील वर्षीचा मोसम मे महिन्याच्या आधी संपवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. यंदाच्या वर्षी पावसामुळे अनेक सामन्यांमध्ये अडथळे आले होते. तसेच अंतिम सामनाही राखीव दिवशी खेळवावा लागला होता.
यापूर्वी 2009 साली ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली गेली होती. त्यावेळीही निवडणुकांमुळेच हा निर्णय घेतला गेला होता. तर 2014 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या व त्यावेळी स्पर्धेचे काही सामने अमिरातीत खेळवले गेले होते.