अहमदाबाद – आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेल्या भारताच्या वा संघातील खेळाडूंना यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मोठ्या रकमेचे करार मिळवत खेळण्याची संधी होती. मात्र, बीसीसीआयच्याच एका नियमामुळे या खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नसल्याचे समोर आले आहे.
बीसीसीआयच्या या नियमानुसार किमान एक प्रथम श्रेणीचा सामना किंवा लिस्ट एचा सामना खेळेलेल्या 19 वर्षांखालील संघातील खेळाडूंनाच आयपीएल लिलावात सहभागी होता येते. जर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसेल तर त्यांना वयाची19 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. या नियमामुळे विश्वकरंडक विजेत्या 19 वर्षांखालील भारतीय संघातील यष्टीरक्षक दिनेश बाना, उपकर्णधार शेख राशीद, डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार, अष्टपैलू निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, सलामीवीर अंगक्रिष रघुवंशी, मानव पारख आणि गर्व सांगवान यांना यंदाच्या स्पर्धेत केळता येणार नसल्याचे दिसत आहे.
अर्थात, बीसीसीआयने त्यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेट फारसे झालेले नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या अनेक अधिकाऱ्यांनी या खेळाडूंना या नियमात सवलत द्यावी असे मत व्यक्त केले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धा या महिन्यात सुरू होत आहे. जर या खेळाडूंना त्यांच्या राज्याच्या संघांनी आपल्या रणजी संघात स्थान दिले तरी ते 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल लिलावावासाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे आता बीसीसीआय व आयपीएल समिती काय निर्णय घेते याकडे युवा खेळाडूंचे लक्ष लागले आहे.