नवी दिल्ली – ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू, नद्यांमध्ये तरंगणारी प्रेते आणि घरी परतणारे स्थलांतरितांचे रेकॉर्ड यासह सरकारकडे कोणताच डेटा अस्तित्वात नाही. कोणतीच आकडेवारी नसलेले हे सरकार आहे अशी टिका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना केली.
चिदंबरम म्हणाले की देशात बेरोजगारी वाढत आहे , महागाई वाढत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थ, खते, अन्नधान्य आणि अन्य बाबतीत असलेल्या सबसीडीत कपात करून गरीबांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. देशातील 142 कोटी जनतेचे कल्याण सरकारने वाऱ्यावर सोडले आहे असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिल्यानंतर लगेचच चिदंबरम बोलले. ते म्हणाले की नोकऱ्या आणि रोजगाराबद्दल हे सरकार अधिक जोरकसपणे बोलत होते. आणि याच सरकार मध्ये 31 मार्च 2021 पर्यंत केंद्र 8.72 लाख जागा रिक्त राहिल्या आहेत. सरकारने केवळ 78,264 जागांवर भरती केली पण जवळपास 8 लाख रिक्त जागा सोडल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर चिदंबरम उपहासाने म्हणाले, अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचे हे भाषर सर्वात छोटे भाषण होते. संसदेत टुकडे टुकडे गॅंगचे सदस्य आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला आहे, पण हे सदस्य कोण आहेत याचाही डाटा सरकारकडे नाही.
सरकार सन 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते आज 2022 उजाडला आहे किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले, याबाबतही सरकारकडे कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकार वित्तीय तूट कमी करणार होते पण तेही काम या सरकारला जमलेले नाही. यंदा उद्दीष्ठापेक्षाही वित्तीय तूट वाढली आहे असे ते म्हणाले.