मुंबई – दिल्ली कॅपिटल्स संघातील दोन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य करोनाबाधित असल्याचे आढळल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेलाही धोका निर्माण झाला आहे. ही स्पर्धा नियमांचे पालन करूनच खेळावी लागणार आहे. मात्र, या नियमांतील कठोरता इतकी आहे की, खेळाडूंची अवस्था सांगू शकत नाही व सहनही होत नाही अशीच बनली आहे.
राजधानीत करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना पुन्हा एकदा या स्पर्धेतील अन्य काही संघात करोनाने एन्ट्री घेतली तर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेवर करोनाचे सावट निर्माण होईल, याची भीती आहे. स्पर्धा जर स्थगित करावी लागली तर नव्या वेळापत्रकानुसार गेल्या मोसमाप्रमाणे अन्य देशात स्पर्धा हलवावी लागेल.
या स्पर्धेसाठी करोनाचे नियम कठोर असले तरीही त्याचे पालन आपल्या सुरक्षेसाठी करावेच लागणार आहे. मात्र, गेली दोन वर्षे याच विषाणूच्या भीतीने खेळाडू व स्पर्धा यांसाठी बायोबबल ही अद्ययावत सुरक्षा व्यवस्था सुसज्ज केली गेली. आता असून अडचण नसून खेळंबा, अशी त्याचीही अवस्था बनली आहे.
पाहुया नियम काय आहेत
– एखादा खेळाडू किंवा संघाचा सदस्य पॉझिटिव्ह आढळला तर त्याला सात दिवस विलगीकरणात पाठवणार
– 24 तासांच्या आत आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच पुन्हा खेळण्याची संधी
– एखाद्या संघाचे अनेक सदस्य पॉझिटिव्ह आढळले तर निगेटिव्ह ठरलेल्या 12 खेळाडूंसह सामना खेळवला जाणार.
या 12 खेळाडूंमध्ये सात भारतीय आणि एक राखीव खेळाडू आवश्यक
– 12 निगेटिव्ह खेळाडू उपलब्ध नसतील, तर मात्र आयपीएल समितीचा निर्णय बंधनकारक
– बायोबबलचे उल्लंघन केल्यास खेळाडूला स्पर्धेतून बाहेर करणार
– खेळाडूंच्या कुटुंबाने नियम मोडल्यास त्यांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार
– तसेच त्या कुटुंबातील खेळाडूलाही सात दिवस विलगीकरणात पाठवणार
– संघाकडून नियमाचे उल्लंघन झाले, तर एक कोटीचा दंड
– पहिल्यांदा नियम मोडला तर 1 कोटी दंड; पण पुन्हा चूक घडली तर त्या संघाला गुणांची पेनल्टी
– बीसीसीआयकडून करोना चाचणीचे नवे निकष लागू
– एखाद्याने चाचणी केली नाही तर त्याला सक्ती करणार
– सक्तीनंतरही चाचणी न केल्यास 75 हजारांचा दंड
– त्याला स्टेडियम, डगआऊट व सर्वत्र संचार बंदी