मुंबई – सरकार ओबीसी आरक्षणाच्या नावावर निवडणुका पुढं ढकलत आहे. उद्या, परवा, एक महिन्यानंतर, सहा महिन्यानंतर कधीही निवडणुका झाल्या तर भाजपची सत्ता येणार आहे, असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. राज्यात सर्वात जास्त जागा आम्हीच जिंकू असा विश्वास यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं होतं. त्यानंतर राज्यात इम्पेरिकल डाटाचा गोंधळ सुरू झाला. डाटा व्यवस्थित नसल्याच्या कारणावरून सध्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आरक्षणावरून जोरदार गोंधळ झालेला पहायला मिळाला आहे.
मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणावरून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून जोरदार टीका केली आहे.ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकवणे गरजेचे आहे. आरक्षण नाही टिकले तर ते सर्व अपयश हे सरकारचे असेल, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. परिणामी वाद वाढला आहे.