मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाला शिवसेनेने आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी निमंत्रित केले आहे. राज्यात सुरु असलेले सत्ता नाट्य अखेर संपले असून, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
औष्णिक वीज प्रकल्पसाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या साठी सातत्याने पाठपुरावा करून देखील काही उपयोग होत नसल्याने, अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जानेवारी, 2018 मध्ये 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले होते. उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला देऊ केला होता. मात्र हा मोबदला योग्य नसल्यानं वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी सांगितले की, शिवसेना भवनातून फोन आला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, चांगल्या योजना राबवाव्यात. भाजपाने माझ्या वडिलांनाही न्याय दिला नाही. त्यांनी तर आत्महत्या केली. राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही भाजपने न्याय दिला नसल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.