Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धडकणार असल्याचे सांगितले. परंतु आज सकाळी त्यांनी आपल्या निर्णयात बदल केला आणि पुन्हा एकदा अंतरवालीत दाखल झाले. मात्र असे असताना देखील काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून बस देखील पेटवण्यात आली. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंटरनेटसह एसटी बस सेवा बंद
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. येथील इंटरनेट सेवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जरांगे हे फडणवीस यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यावर निघाले होते. यावेळी जरांगे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर आता मराठा समाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.
अंबड तालुक्यात संचारबंदी लागू
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे. दरम्यान, याप्रकरणी “संचारबंदी का लावली? कारण काय? अंबड तालुक्यात संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायच नाही. फडणवीसांनी रात्री बंदुकीची फोटो टाकला. दम होता तर थांबायच, आम्हाला येऊ द्यायच नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही,” असेही जरांगे यांनी फडणवीसांवर निशाणा साधत म्हंटले आहे.