नवी दिल्ली – करोना संकटामुळे भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणांना काही महिन्यांपासून स्थगिती दिली आहे. त्या स्थगितीची मुदत आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थात, निवडक मार्गांवर विशिष्ट उड्डाणांसाठी सक्षम यंत्रणांकडून परवानगी दिली जाऊ शकते. करोना संकट उद्भवल्यानंतर भारताने मागील वर्षीच्या 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे स्थगित केली.
मात्र, काही काळानंतर वंदे भारत अभियानांतर्गत विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली. त्याशिवाय, भारताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, भूतान, संयुक्त अरब अमिराती आदी 24 देशांशी द्विपक्षीय करार केले. त्याअंतर्गत भारत आणि संबंधित देश परस्परांच्या हद्दीत विशेष विमानसेवा सुरू ठेऊ शकतात. तसेच, स्थगिती आदेशाचा परिणाम आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीवर होणार नाही.