नवी दिल्ली – भारताच्या चार खेळाडूंनी उपांत्य फेरीत स्थान मिळवित सलाम उमाखानोव चषक आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत किमान ब्रॉंझपदक निश्चित केले. ही स्पर्धा रशियातील कस्पियेक सुरू आहे.आशियाई सुवर्णपदक विजेती पूजा राणी (75 किलो), जागतिक ब्रॉझपदक विजेती लवलिना बोर्गोहेन (69 किलो), नीरजा (57 किलो) व जोनीकुमारी (60 किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या पिंकी जांगराला मात्र पराभवास सामोरे जावे लागले.
नीरजाने इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तिने रशियातील स्पर्धेत साओना सागातेवाला 4-1 असे हरविले. पूजाने रशियाच्या लॉरा मामेदकुलेवाचा 4-1 याच फरकाने पराभव केला. जोनीकुमारीने बेलारूसच्या ऍनास्ताशिया ओबुशेन्कावोचा 5-0 असा धुव्वा उडविला. लवलिनाने रशियन खेळाडू ऍनास्ताशिया सिगायेवाला 5-0 असे निष्प्रभ केले. माजी राष्ट्रकुल ब्रॉंझपदक विजेती पिंकीला बेलारूसच्या युलिया अपनसोविचने 5-0 असे नमविले.
पुरुषांच्या बिभागात आशिष इनिशाने 52 किलो गटात अपराजित्व राखले. त्याने अजरबैजानच्या सलमान अलिझादेवर 4-1 असा सनसनाटी विजय मिळविला व उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या गौरव सोळंकी (56 किलो), गोविंद सहानी (49 किलो) व संजीतकुमार (91 किलो) यांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.