पिंपरी, (प्रतिनिधी) – तिकिट चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वल्लभनगर एसटी आगाराकडून वाहकांची तपासणी केली जात आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार आगाराकडून ही कार्यवाही केली जात आहे. एसटी बाहेर वाहक आल्यानंतर त्याची तपासणी करून अपहान न झाल्याबाबत खात्री केली जात आहे. तिकिट चोरीची राज्यात घटना घडल्यानंतर महामंडळाकडून ही तपासणी मोहिम सुरू केल्याचे आगाराकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक बाजू कमकुवत होण्यास तिकीट चोरी हे प्रमुख कारण सांगितले जाते. वाहकांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधत अपहार केला जात असल्याचा गंभीर प्रकार आढळला आहे. त्यामुळे एसटीचे राज्य महामंडळ सतर्क झाले आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाहकांची ८ ते १० फेब्रुवारी पर्यंत वल्लभनगर आगारात तीन दिवस तपासणी सुरू केली आहे.
या तपासणी मोहीमेमधून तिकीट चोरी होते की नाही, अशी खात्री राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी करीत आहेत. याअंतर्गत त्यांचे मॅन्युअल ट्रे, तिकीट पेटी, बैंग आणि खिसेही तपासले जात आहेत. तीन दिवस राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत वाहकांचे मोबाइलही तपासले जात आहेत. त्यामध्ये कोणते अँप आहे, याची पाहणी करण्यात येत आहे. प्रवाशाला दिलेले तिकीट योग्य दराचे, योग्य सवलतीचे आहे की नाही, याची खात्री करून घेतली जाणार आहे. ईटीआय मशीन व्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्यास त्याची सखोल चौकशी केली जात आहे.