भिगवण -येथे इंदापूर तालुका बाजार समितीच्या मार्फत मासळीबाजार चालवला जातो. हा मासळी बाजार करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील सुमारे अडीच महिने बंद होता. शासनाने टाळेबंदीत दिलेल्या सवलतींचा उपयोग करून हा बाजार सुरू करण्यात आला आहे. मात्र बाजारात सध्या मासळीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (दि. 15) पासून भिगवण (ता. इंदापूर) येथील मासळी बाजार सुरू करण्यात आला आहे.
पावसाचे वातावरण, वारे यामुळे मच्छिमारांना मासे मिळत नाहीत. त्यामुळे माशांची दरवाढ सुरू झाल्याचे दिसत आहे.टाळेबंदीच्या काळात 40 रुपये प्रति किलो असलेला चिलापी माशाचा दर सध्या 100 ते 120 रुपये झालेला आहे. त्याचबरोबर कटला, रोहू इत्यादी माशांचे दर 150 ते 200 रुपये किलो प्रमाणे आहेत. शिंगटा जातीचा मासा प्रति किलोला 150 रुपये दराने विकला जात आहे.
मागणी तसा पुरवठा नाही
मासळी बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरामध्ये वाढ झाल्याने आणि पाहिजे तसा माल मिळत नाही, यामुळे ग्राहक बाजाराकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. मासळीला प्रचंड मागणी असते. परंतु यंदा करोनामुळे बाजाराच्या उलाढालीवर पाणी फिरले आहे.