नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये मागच्या काही दिवसांपासून संघर्ष वाढत चालला आहे. त्यात हा संघर्ष अधिक वाढू नये, यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलेली दिसत नाही. कारण सध्यातरी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये कुठलीही चर्चा होणार नाही तसेच चीनने पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठ्य प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे.त्यामुळे दोन्ही देशामध्ये शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
फिंगर फोरवर चीनने हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणी सुरु केली आहे. पँगाँग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चिनी सैन्य तुकडयांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर फोरवर दावा सांगत आहे. त्यादृष्टीने त्यांनी तिथे सुरु केलेली तयारी निश्चित धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरला आहे. यापू्र्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे. “पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केलीय हे बरोबर आहे. मागच्या आठ आठवडयात त्यांनी फिंगर क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामे केली आहेत, त्यात हेलिपॅड आणखी एक नवीन काम आहे, असे एका अधिकाऱ्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
‘आम्ही माघार घेणार नाही तसेच परिस्थिती जैसे थे तशी कायम करणार नाही हाच चीनच्या कृतीमधून अर्थ निघतो’ असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच ‘पँगाँग टीएसओ क्षेत्राबद्दल चर्चा करण्यात त्यांना रस नाहीय’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी चीनने वेळोवेळी घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असा इशारा भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी दिला आहे.