प्रभात वृत्तसेवा
पुणे – सामान्य माणसाच्या डोक्यावरील महागाईचे संकट या सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. त्यामुळे जे आम्हाला महागाईत टाकतात त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने आयोजित महागाई आणि बेरोजगारी विरोधात “जनजागर यात्रा, सावित्रीच्या लेकींचा’ या यात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात बुधवारी करण्यात आला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जनजागर यात्रेनिमित्त तुम्ही ज्या ठिकाणी जाणार तिथे जे घडतंय ते दुरुस्त करण्याची भूमिका प्रामाणिकपणे मांडा. पक्षामध्ये एखाद्या भगिनीला संधी दिल्यानंतर त्या संधीचे सोनं करण्याची कुवत ज्यांच्यामध्ये आहे, त्यांची संख्या कशी वाढेल हे पाहा. कर्तृव करण्याचा मक्ता केवळ पुरुषांसाठी नाही; तर स्त्रियांना सुद्धा संधी द्या त्या तुम्हाला कर्तुत्व दाखवतील,’ असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
फौजिया खान म्हणाल्या, “हजारो वर्षांपासून महिला दुय्यम दर्जाचे जीणं जगते आहे. प्रत्येक युगात स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळण्यासाठी अनेक महापुरूषांनी लढा दिला. आजच्या युगात आपल्या साहेबांनी शासकीय धोरण आणून या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले. विद्या चव्हाण म्हणाल्या, मागील आठ वर्षात सरकारने दिलेले एकही वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे वाढलेल्या महागाई, बेरोजगारी या विषयांवर जनतेला जागरूक करायचे आहे.’
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जनजागर यात्रेची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायची आहे. त्यासोबतच हुमुकशाहीची पोलखोल म्हणून पक्षाच्यावतीने केलेले काम लोकांपुढे मांडण्याचे काम करायचे आहे.’ श्रीनिवास पाटील म्हणाले, हा जागर सावित्रीच्या लेकींचा आहे. बेरोजगारी केवढी वाढली आहे. गॅस आणि काय काय महागलं आहे या सर्व गोष्टी आपल्याला लोकांपुढे मांडायच्या आहेत.
वंदना चव्हाण म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांकडून जातीवाद वाढून त्यातून मॉबलिंचिंग करण्याचे काम होत आहे. संविधानाची पायमल्ली होत आहे. अनेक शासकीय संस्था आपल्या मार्गाने चालविण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. यावर आपण आता आवाज उठवायला हवा, आता वेळ आली आहे ती महाराष्ट्राच्या भगिनीने दुर्गेचे रुप दाखविण्याची.