जम्मू -शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सरलेले वर्ष (2020) जम्मू-काश्मीरसाठी सकारात्मक ठरले. वर्षभरात दहशतवादी हल्ले आणि त्यामध्ये होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण घटले. त्याशिवाय, घुसखोरीच्या घटनाही कमी झाल्या.
जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी गुरूवारी वार्षिक आढावा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी दहशतवाद आणि घुसखोरीविषयीची माहिती दिली. वर्षभरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात 103 मोहिमा राबवल्या. त्यामध्ये 225 दहशतवादी ठार झाले. त्यामध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या 47 म्होरक्यांचा समावेश होता.
दहशतवादविरोधी लढ्यात 16 पोलिसांना आणि इतर दलांच्या 44 जवानांना वीरमरण आले. दहशतवादी हल्ल्यांत 38 नागरिक मृत्युमुखी पडले. वर्षभरात 299 दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली. त्याशिवाय, 12 दहतशतवादी शरण आले, असे त्यांनी सांगितले.
भारतीय सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानातून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे दहशतवाद्यांचे प्रमाण घटले. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी यंत्रणांचा पाठिंबा मिळतो. तसे असले तरी मागील तीन ते चार वर्षांच्या तुलनेत घुसखोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट नोंदली गेली, असा दावा सिंह यांनी केला.