कोपरगाव -अल्पवयीन मुलीसह महिलांवर सामूहिक अत्याचार करून त्यांना दिवसाढवळ्या जिवंत जाळले जाते. एका मागून एक अशा घटना घडत असताना या राज्याचे गृहखात झोपले आहे का? असा प्रश्न भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला.
कोपरगाव भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून एल्गार मोर्चा काढून एकदिवशीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपचे प्रांतिक सदस्य ऍड. रवींद्र बोरावके, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, बाळासाहेब पानगव्हाणे, सुशांत खैरे, गटनेते रवींद्र पाठक, नगरसेवक विजय वाजे, स्वप्निल निखाडे, सत्येन मुंदडा, आरपीआयचे दिपक गायकवाड, संभाजी रक्ताटे, केशव भवर, हरिभाऊ गिरमे, नगरसेविका मंगल आढाव, विद्या सोनवणे, हर्षदा कांबळे, वैशाली सोनवणे, शिल्पा रोहमारे, अप्पासाहेब दवंगे, मुकुंद काळे, नानासाहेब गव्हाणे, बबलु वाणी, विनोद राक्षे, अन्वर शेख, आलताफ कुरेशी उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात महिलांना पेटवून देण्याच्या घटना घडतात.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आंध्रप्रदेशप्रमाणे राज्यात दिशा कायदा लागू हा झाला पाहिजे. सध्याची ही महाविकास आघाडी सरकार नसून स्थगिती सरकार आहे, अशी म्हणण्याची वेळ आली. फडणवीस सरकारने जनहिताच्या अनेक योजना सरकार स्थगित करीत आहेत. बारामतीवरून करामती केल्या जातात. या सरकारने जनतेला मोठी आश्वासने दिली होती. मात्र त्याचा विसर पडला आहे. भाजप-सेना सरकारच्या काळात मतदार संघात 500 कोटीचे विकास कामे मंजूर आणली. ती विद्यमान आमदारांनी पूर्ण करावीत, असे त्या म्हणाल्या.
बिपीन कोल्हे म्हणाले, नाममात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दिशाभूल केली. पाणी मुबलक असूनही शेतकऱ्यांच्या पिकांसाठी वेळेत आवर्तन मिळत नाही ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत की नाही असा प्रश्न पडतो. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणलेल्या निधीला आडवे येऊ नये, हे आमचे पहिले आंदोलन म्हणजे शांती आहे. पुढचे आंदोलन क्रांती असेल, ही जन्मता शिकवण असल्याने आम्हाला सत्तेची लालसा नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत असे ते म्हणाले.
सकाळी अकरा वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून एल्गार मोर्चा सुरुवात झाली. आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत कोपरगाव तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. तहसीलदार योगेश चंद्रे यांना मागण्यांचे निवेदन दिले.