मुंबई – मायदेशात होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी चाहत्यांना बीसीसीआय व मुंबई क्रिकेट संघटनेने आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यासाठी मैदानाच्या शंभर टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. हा दुसरा कसोटी सामना असून त्यापूर्वी पहिला कसोटी सामना कानपूरला होणार आहे.
आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर न्यूझीलंड संघाचे भारतात आगमन झाले असून या मालिकेची सुरुवात तीन टी-20 सामन्यांनी होणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामने होतील. या मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्मा कडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून नियमित कर्णधार विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यामुळे रोहितकडे ही जबाबदारी दोण्यात आली आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीतून कोहलीने माघार घेतली असून रोहितलाही विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल.
दुसरा कसोटी सामना मुंबईत होत असून या सामन्यासाठी कोहली संघात परतणार असून संघाचे नेतृत्व तोच करणार आहे. राज्य सरकारने मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) वानखेडेवरील दुसऱ्या कसोटीसाठी 100 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येण्यासाठी परवानगी दिली आहे. खेळाडूंना मालिकेसाठी सज्ज होण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात कसोटी संघाचा सरावही सुरु झाला आहे.
या सराव सत्रात रहाणेसह चेतेश्वर पुजारा व अन्य खेळाडूंनीही भाग घेतला. पहिला कसोटी सामना येत्या 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमध्ये होणार आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 डिसेंबरदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये होणार आहे. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग असणार आहे.
न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, महंमद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.