एजबस्टन – विराट कोहली व रवीचंद्रन अश्विन हे पूर्ण तंदुरुस्त ठरल्यानंतर आता भारतीय संघाचा नियमित कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याला करोनाची बाधा झाल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीला येत्या 1 जुलैपासून सुरुवात होण्यापूर्वीच हे वृत्त आल्याने पुन्हा एकदा सामन्यावर करोनाचे सावट आणखी गडद होऊ लागले आहे.
लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामन्यांत रोहित पहिल्या दिवशी फलंदाजीला आला, मात्र दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आला नाही. त्यावरून बीसीसीआयला प्रश्न विचारले जाऊ लागले होते. अखेर त्याला करोनाची बाधा जाली असून त्याला हॉटेलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले.
रोहितची रॅपिड अँटीजेन चाचणीघेण्यात आली होती व त्यात तो बाधित असल्याचे समोर आले. रोहितपूर्वी माजी कर्णधार विराट कोहली व रवीचंद्रन अश्विन यांनाही करोनाची बाधा झाली होती. कोहली इंग्लंडमध्ये दाखल झाला तेव्हा त्याला ही बाधा झाली होती मात्र, त्यानंतर तो पूर्ण तंदुरुस्त झाला व सराव सामन्यातही खेळला. संघ इंग्लंडला रवाना होत असताना अश्विनही करोनाबाधित असल्याचे समोर आले होते व त्यामुळे तो संघासह इंग्लंडला रवाना होऊ शकला नाही. मात्र, त्याने विलगीकरणात राहून उपचार घेत तंदुरुस्त झाल्यावर तोदेखील इंग्लंडला रवाना झाला.
पंत, पुजारा किंवा बुमराहकडे नेतृत्व
रोहित शर्मा या कसोटीत खेलू शकला नाही तर त्याच्या जागी संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवले जाणार याची चर्चाही आता रंगू लागली आहे. निवड समितीसमोर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह व चेतेश्वर पुजारा असे तीन पर्याय आहेत. मात्र, त्यापूर्वी रोहितचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होउन तो करोनाच्या फेर चाचणीत निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तर तो कसोटी खेळू शकेल, असे संकेतही बीसीसीआय व निवड समितीने दिले आहेत.
इंग्लंड व भारत यांच्यातील एकमेव कसोटी सामना येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा एक भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत भारतीय संघाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी पुढे ढकलली गेली होती. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेत या कसोटीचा समावेश असून जर भारतीय संघाने ही कसोटी जिंकली तर 2007 सालानंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल.