मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे याप्रकरणात दिवसेंदिवस कायदेशीर गुंतागुंत वाढतच असल्याने शिंदे यांच्यापुढे आता दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाशिवाय पर्यायच उरलेला नाही. यामुळे शिंदेगटात चलबिचल सुरू झाली आहे.
शिंदे 40 बंडखोर आमदारांसह गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. मात्र या सहा दिवसात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि भावनिक साद याव्यतिरिक्त फार काही राजकीय हालचाली झालेल्या नाहीत. शिंदे यांनी स्वतंत्र शिवसेना बाळासाहेब गटाची घोषणा केली. मात्र त्यास ठाकरे कुटुंबीय आणि राज्यभरातून विरोध होत असून बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करत असल्याचा आरोप शिंदेगटावर करण्यात येत आहे.
शिंदे यांचे शिवसेनेत माघारी येण्याचे परतीचे दोरही कापले गेले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिकच चिघळला असून शिंदेगटा विरोधात राज्यभरात वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे शिंदेगट यापुढे काय करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. पण पक्षांतरविरोधी कायद्यातील गुंतागुतीमुळे शिंदे यांना निर्णय घेण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामुळे आपल्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करणारे शिंदे यांना कायद्याचे फार ज्ञान नसावे अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. कायदेतज्ज्ञांच्या मते पक्षांतर कायदा विभाजन ओळखत नाही, दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही.
त्यापेक्षा त्यांना दुसऱ्या नोंदणीकृत गटात विलीनीकरण करावे लागणार आहे. त्यांनी तसे न केल्यास ते अपात्र ठरतील. सध्या शिंदेगटात सामील झालेले आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत किंवा भाजपमध्ये शिंदेगटाला विलनीकरण करावे लागणार आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नसल्याचे कायदेपंडितांचे म्हणणे आहे.