India vs Australia 2ND ODI : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतानं 99 धावांनी विजय मिळवला. यासह Team India ने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं 50 षटकांत पाच गडी गमावून 399 धावा केल्या. पावसामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 33 षटकांत 317 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ 28.2 षटकांत सर्वबाद 213 धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत सीन अॅबॉटने 54 आणि डेव्हिड वॉर्नरने 53 धावा केल्या. मार्नस लॅबुशेनने 27 आणि जोश हेझलवूडने 23 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने 19 आणि अॅलेक्स कॅरीने 14 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट नऊ धावा केल्यानंतर, जोश इंग्लिश सहा धावा केल्यानंतर आणि अॅडम झम्पा पाच धावा करून बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ तर खातेही उघडू शकला नाही.
भारताकडून गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. प्रसिध कृष्णाला दोन आणि मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.
इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. 2006 मध्ये भारतीय संघ येथे प्रथमच एकदिवसीय सामना खेळला होता. येथे सात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताली कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही.मालिकेतील विजयासोबतच भारताने याा वर्षीच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. कांगारू संघाने मार्चमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. दोन्ही संघांमधील सध्याच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (27 सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
तत्पूर्वी,ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्या झंझावती शतकी तर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार राहूल यांच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 5 बाद 399 धावा करत ऑस्ट्रेलियानपुढं विजयासाठी 400 धावाचं मोठं लक्ष्य ठेवलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या 383 धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये बेंगळुरूमध्ये केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या :-
धावसंख्या ठिकाण वर्ष
399/5 इंदूर, 2023
383/6 बेंगळुरू, 2013
362/1 जयपूर, 2013
358/9 मोहाली, 2019
354/7 नागपूर, 2009
त्याचवेळी, एकूण वनडेमधली ही भारताची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या 418/5 आहे, जी त्यांनी डिसेंबर 2011 मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. इंदूरच्या मैदानावर ही भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
एकदिवसीय सामन्यात भारताची सर्वोच्च धावसंख्या :-
धावसंख्या विरूध्द स्थान वर्ष
418/5 वेस्टइंडिज, इंदूर, 2011
414/7 श्रीलंका, राजकोट, 2009
413/5 बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007
409/8 बांगलादेश, चट्टोग्राम, 2022
404/5 श्रीलंका, ईडन गार्डन्स, 2014
401/3 दक्षिण आफ्रिका, ग्वाल्हेर, 2010
399/5 ऑस्ट्रेलिया, इंदूर, 2023
भारताकडून शुभमन गिलने 97 चेंडूत 104 धावा, श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा आणि कर्णधार केएल राहुलने 38 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी इंदूरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने 37 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा 13 धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये 24 चेंडूत 44 धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात 54 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कॅमेरून ग्रीनने दोन बळी घेतले. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
श्रेयस अय्यरनंतर शुभमन गिलनेही शतक झळकावल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. त्याने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. तर श्रेयसने 90 चेंडूंत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 105 धावांची खेळी केली. शुभमन आणि श्रेयसमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी झाली.
गिलचे सहावे शतक…
श्रेयस अय्यरनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुभमन गिलचाााही जलवा पाहायला मिळाला. त्याने 92 चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे तर एकूण नववे शतक झळकावले. वनडेतील सहा शतकांव्यतिरिक्त त्याने कसोटीत दोन आणि टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे.
अय्यरचे तिसरे शतक
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 86 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वनडे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले आहे.