हांगझोऊ :- भारताच्या महिला क्रिकेट संघाने येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला व पदकही निश्चित केले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा डाव अवघ्या 51 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्या कर्णधार व यष्टीरक्षक निगार सुलतानाने सर्वाधिक 12 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्रकारने सर्वाधिक 4 बळी घेतले.
भारताने 2 गडी गमावून 52 धावा करत हा सामना जिंकला. भारताची सलामीवीर कर्णधार स्मृती मानधना 7 धावांवर बाद झाली. तर आक्रमक शेफाली वर्मा 17 धावा करून परतली. त्यानंतर जेमिमा रॉड्रीक्सने नाबाद 20 धावा करत संघाचा विजय साकार केला. कनिका आहुजाने नाबाद 1 धाव केली. बांगलादेशची भारताविरुद्धची टी-20 महिला क्रिकेटमधील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली.
श्रीलंकेशी रंगणार अंतिम लढत…
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानला केवळ 75 धावाच करता आल्या. त्यांच्या शव्वाल जुल्फीकारने सर्वाधिक 16 धावा केल्या. श्रीलंकेच्या प्रबोधिनीने 3 गडी बाद केले.
श्रीलंकेने चार गडी गमावून 16.3 षटकांत 77 धावा करत विजय मिळवला. त्यांच्याकडून हर्षिता समरविक्रमाने सर्वाधिक 23 धावांची खेळी केली. आता उद्या (सोमवार) भारत व श्रीलंका यांच्यात अंतिम लढत होणार आहे.