विकास आराखडा : भूयारी गटार योजना सांडपाणी प्रकल्पाची यशस्वी चाचणी
देहुरोड – तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांर्तगत राबविण्यात आलेली भूयारी गटार योजना (मलनि:सारण) सांडपाणी (एसटीपी) प्रकल्पाची शुक्रवारी (दि. 13) प्रायोगिक यशस्वी चाचणी घेण्यात आली. नव्या वर्षात प्रकल्प सुरू होताच प्रदूषणाने गुदमरणाऱ्या देहूतील इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेणार आहे.
तीर्थक्षेत्र देहूत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांर्तगत सुमारे 33 कोटी रुपये खर्च करून मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यात आला. अनेक दिवसांपासून प्रकल्प तयार होऊनही अद्यापपर्यंत सुरू करण्यात आले नव्हते. त्याठिकाणी आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नसल्याने प्रकल्प सुरू करता येत नव्हते.
गावातील पाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये जात असल्याच्या तक्रारी होत्या. हा प्रकल्प तयार करताना गावातील घरामधील सांडपाणी व मलवाहिन्या या मुख्य वाहिन्यांना नागरिकांनी जोडल्याने काही ठिकाणची भूयारी गटारे तुंबलेली होती. काही ठिकाणी जोडलेली नव्हते, तर काही ठिकाणी गळती होत होती. याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारा विद्युत पुरवठाही महावितरणने नुकतेच सुरू केला असल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करून त्याची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली आहे. याद्वारे मल व सांडपाणी शुद्धीकरणाची पाहणी करण्यात आली. या चाचणीनुसार हा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाला असल्याचे तर जवळपास 90 टक्के मल व सांडपाणी या प्रकल्पाद्वारे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.
देहूगावातील हा प्रकल्प 1 जानेवारी 2020 पासून पुढील सहा महिन्यांसाठी संबधीत ठेकेदार चालविणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी दिली. त्या आगोदर या प्रकल्पाची चाचणी गावातील सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमोर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत गावातील नागरिकांनी घरातील सांडपाणी व मलवाहिन्या या मुख्यवाहिन्यांना रहिवाशांनी तातडीने जोड्याव्यात, असे आवाहन केले आहे. या प्रकल्पाद्वारे पंपिंग स्टेशन व मल शुद्धीकरण प्रकल्प योग्य पद्धतीने काम करीत असून, भविष्यात देहूतील सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात मिसळणार नसल्याने नदीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण निश्चितपणे घटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इंद्रायणीत बेकायदा वाळू उपसा सुरू…
इंद्रायणी नदी पात्रालगत असणारे सांडपाण्याच्या मुख्य वाहिन्या एसटीपी प्रकल्पाकडे गेले आहे. इंद्रायणी नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे, ती वाहने, जेसीबी, ट्रॅक्टर मुख्य वाहिन्यांवरून जाताना वारंवार फुटत आहेत.