नवी दिल्ली – भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर जी बंदी लागू केली आहे त्यामुळे जागतिक बाजारात तांदळाच्या व अन्नधान्याच्या भावाबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे, अशी चिंता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संचालक पियरे गौरींचस यांनी व्यक्त केली आहे.
भारताच्या या निर्णयावर काही देश सुडात्मक उपायदेखील करू शकतात. त्यामुळे ही अस्थिरता अधिकच व्यापक ठरू शकते. म्हणून आम्ही या प्रकारचे निर्यात निर्बंध काढून टाकण्यास प्रोत्साहित करू. कारण, ते जागतिक स्तरावर हानिकारक असू शकतात, असे गौरींचस यांनी मंगळवारी जागतिक आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल प्रकाशित केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयानंतर जागतिक चलनवाढीवर काय परिणाम होईल, असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष म्हणजे, रशियाने संयुक्त राष्ट्र आणि तुर्कस्तानच्या मध्यस्थीने ब्लॅक सी धान्य करारातून बाहेर पडण्याच्या घोषणेनंतर भारतानेही तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जगाला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी ब्लॅक सी धान्य करार महत्त्वाचा होता, असे ते म्हणाले. 33 दशलक्ष टन धान्य युक्रेनमधून उर्वरित जगाला पाठवले गेले. आणि यामुळे अन्न आणि धान्याच्या किमती कमी होण्यास मदत झाली, असे गौरींचस म्हणाले.
पश्चिम आफ्रिकन देश बेनिन हा भारतातून बिगर बासमती तांदळाचा प्रमुख आयातदार आहे. नेपाळ, बांगलादेश, चीन, आयव्होअर, टोगो, सेनेगल, गिनी, व्हिएतनाम, जिबुती, मादागास्कर, कॅमेरून, सोमालिया, मलेशिया, लायबेरिया आणि यूएई हे देशही या तांदळाची मोठ्या प्रमाणावर आयात करतात. भारतात भाताच्या पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे भारताने दक्षतेचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.