-स्वप्निल श्रोत्री
इतिहास साक्षी आहे, ज्यावेळी भारत संकटात सापडला आहे त्यावेळी त्या संकटावर मात करून तो पूर्ण क्षमतेने उभा राहिला आहे. त्यामुळे एकाच वेळी आलेल्या ह्या अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देऊन भारत पुन्हा एकदा नव्या ताकदीने उभा राहील यात शंका नाही.
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या बातम्या पुन्हा एकदा नव्याने कानावर पडू लागल्या आहेत. मागील 4 महिन्यांपासून सुरू असलेला हा तणाव निवळण्याची सध्यातरी चिन्हे नाहीत. किंबहुना तो निवळला जावा अशी चीनची इच्छा दिसत नाही. जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते संरक्षणमंत्र्यांपर्यंत अनेकांनी सीमेवर असलेला तणाव चर्चेच्या मार्गाने सोडविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केल्याचे दिसून आले. परंतु, कोणताही प्रश्न तेव्हाच मार्गी लागतो जेव्हा तो दोन्ही बाजूंकडून सोडवण्याची प्रामाणिक इच्छा असेल. भारताबरोबर सीमावादाचा प्रश्न जाणूनबुजून चिघळत ठेवणे आणि त्यातून आपला हेतू साध्य करून घेणे ही चीनची रणनीती आहे.
थंडीच्या दिवसात चीनकडून आगळीक होण्याची शक्यता अधिक
सध्या सप्टेंबर महिना सुरू असून दोन महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हिमालयातील तापमान गोठणबिंदूच्या अतिशय खाली उतरते. अशावेळी भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर जेथे भारताची हद्द आहे तेथे मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी आणि हिमस्खलन होते. परिणामी रस्ते आणि महामार्ग बंद होतात. अजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांचा आणि गावांचा देशाशी संपर्क तुटतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या संख्येने भारतीय सीमेवर जवान तैनात करणे अवघड असते; परंतु चीनच्या बाजूने जर ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर ती परिस्थिती भारताइतकी बिकट नसते. त्यातच सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणावर केलेली रस्ते बांधणी, बंकर्स आणि कायमस्वरूपी बांधकाम यामुळे चीनला सैन्याची जमवाजमव कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणावर करणे सहज शक्य आहे; परंतु भारताला हे शक्य नाही. भारताने गेल्या काही वर्षांपासून भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर कायमस्वरूपी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे हे खरे आहे परंतु, अजूनही ते काम हवे तितके पूर्ण झालेले नाही. त्यातच थंडीच्या दिवसांत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असल्यामुळे भारताला कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करणे अवघड आहे.
चीनकडून आगळीक झाल्यास हवाई दलाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा
ज्या प्रमाणात थंडीच्या दिवसांत हिमालयातील भौगोलिक परिस्थिती चिनी लष्कराच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) बाजूने जाते. त्याचप्रमाणे त्याच्या काही प्रमाणात फायदा भारतीय हवाई दलालासुद्धा होतो.
तो पुढील कारणांमुळे…
1) चीनच्या सीमेलगत भारतीय हवाई दलाचे बेस असून ते पूर्ण क्षमतेने कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे सैन्याची ने-आण करणे व सीमेवर कमी वेळात लष्कराची व लष्करी साहित्याची जमवाजमव करणे भारतीय हवाई दलास सहज शक्य आहे.
2) भारतीय हवाई दलास युद्धक्षेत्राचा व प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे अत्यंत जलदगतीने शत्रूवर चढाई करणे शक्य आहे. परंतु, चिनी हवाई दलाकडे हे कसब सध्या तरी नाही.
3) जून 2020 मध्ये कॅनडियन स्कूलच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारतीय हवाई दल हे चीनच्या हवाई दलापेक्षा अधिक सक्षम आणि शक्तिशाली असल्याचे म्हटले आहे. ह्यामुळे भारतीय हवाई दलाचे मनोबल वाढवण्यासाठी भारताला ह्या अहवालाचा फायदा होऊ शकतो.
अमेरिकेच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित
येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या गटाचा संपूर्ण प्रचार हा एकट्या चीन विरोधात केंद्रित केला आहे. त्यातच अमेरिकेत सध्या 15 लाख भारतीय वंशाचे लोक असून त्यांचे एकगठ्ठा मत अमेरिकेतील निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असते. त्यामुळे अमेरिकेतील निवडणुकांच्या आधी जर चीनने भारताबरोबर आगळीक करण्याचा प्रयत्न केला किंवा एका मर्यादेबाहेर जाऊन सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ट्रम्प यांची इच्छा असो वा नसो, किमान निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांना भारताच्या मदतीला यावे लागेल. ही गोष्ट बीजिंगमध्ये बसलेल्या लोकांना माहीत असल्यामुळे एकाच वेळी दोन शक्तिशाली राष्ट्रांशी पंगा घेण्याची हिंमत चीन करण्याची शक्यता कमीच आहे.
भारतीय लष्करासाठी सर्वात कठीण काळ
देशाच्या पूर्व सीमेवर चीनसोबत तणाव सुरू असतानाच पश्चिमेला असलेल्या पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची व आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सीमेवर तैनात करण्यास बंदी असलेले लष्करी साहित्याची व सामानाची जमवाजमव सुरू केली आहे. साहजिकच चीनच्या सूचनेनुसार हे चालू असल्यामुळे ह्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. परंतु, महत्त्वाची गोष्ट ही आहे की, बालाकोट आणि उरी स्ट्राइकच्या नाचक्की नंतरही पाकिस्तानने जेवढे सैन्य सीमेवर जमवले नव्हते त्यापेक्षा जास्त सैन्य आज भारत-पाक सीमेवर आहे. भारतीय लष्कराला एकाच वेळेस चीन, पाकिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवाद अशा तिहेरी संकटास एकाचवेळी तोंड द्यावे लागण्याची शक्यता अधिक आहे.
युद्धज्वर नकोच
आपल्या भारतीय नागरिकांना अनेकदा उत्साहाची भरती येत असते. सीमेवर जरा काही झाले की, अण्वस्त्र टाका, मिसाइल डागा, हल्ला करा अशी भाषा संपूर्ण देशभर वापरली जाते. त्यातच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आपल्या अर्थहीन बातम्या आणि टॉक-शोच्या माध्यमातून परिस्थिती अधिक गंभीर बनवतात. परिणामी सरकारवर जनतेचा दबाव येतो आणि अशावेळी सरकारकडून अशी कृती होण्याची शक्यता अधिक असते, जी करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असू शकते. त्यामुळे देश संकटात असताना सर्वांनी एकत्र राहून सरकारच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
सध्या भारताची अवस्था ही कौरवांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. करोनाची महामारी, वाढते आर्थिक संकट, चीनच्या सीमेवर असलेली तणावपूर्ण परिस्थिती, नेपाळसोबत बिघडलेले मैत्रीसंबंध आणि पाकिस्तानशी असलेले जन्मोजन्मीचे वैर अशा अनेक संकटांशी भारत एकाच वेळी मुकाबला करताना दिसत आहे. हा भारतासाठी कसोटीचा काळ आहे.