नवी दिल्ली – सरलेल्या वर्षांमध्ये भारतात अब्जाधीशांचा संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे भारत अब्जाधीशांच्या संख्येत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न 30 दशलक्ष डॉलर म्हणजे 226 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांचा या आकडेवारीसाठी विचार करण्यात आला.
नाईट फ्रॅंक या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या 748 आहे. चीनमध्ये 554 आहे. तर भारतातील अब्जाधिशांची संख्या 145 इतकी आहे. सरलेल्या वर्षात जागतिक पातळीवर अब्जाधीशांची संख्या 9.3 टक्क्यांनी वाढली, तर भारतातील या नागरिकांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली. शेअर बाजार निर्देशांक वाढल्यामुळे आणि डिजिटल क्रांती झाल्यामुळे भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.
भारतातील अब्जाधीशांची संख्या आता 13,637 इतकी झाली आहे. या अगोदरच्या वर्षांमध्ये ही संख्या 12,287 होती होती. बंगलोरमधील अब्जाधीशांची संख्या सर्वात वेगाने म्हणजे 17 टक्क्यांनी, दिल्लीतील 12 टक्क्यांनी तर मुंबईतील नऊ टक्क्यांनी वाढली. बंगलोरमध्ये 352, दिल्लीत 210, तर मुंबईत 1,596 अब्जाधिश आहेत. भारतात 2016 मध्ये केवळ 7,401 अब्जाधीश होते. ही संख्या वेगाने वाढून 2026 मध्ये अब्जाधीशांची संख्या 19,006 होईल असे या संस्थेला वाटते.
भारतात नव्याने तयार होणाऱ्या अब्जाधिशांच्या संख्येमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याचे नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात भारताची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही भारतातील श्रीमंताच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर जे लोक श्रीमंत आहे त्याच्या श्रीमंतीत वाढ होत आहे.
आता भारताचा विकास दर वेगाने वाढणार आहे. त्यामुळे भारतातील अब्जाधीशांची संख्या त्याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. अगोदर मुंबई शहरामध्ये अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढत होती. मात्र आता मुंबईची जागा बंगलोरने घेतली असल्याचे दिसून येत आहे. कारण बंगलोरमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. या कंपन्या मोठ्या प्रमाणात समृद्धी निर्माण करीत आहेत.