नवी दिल्ली, – अफगाणिस्तानला भारताने गेल्यावर्षीच मानवतावादी भूमिकेतून गहू उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. हा गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पोहोचवण्यास सहकार्य करण्यास पाकिस्ताननेही तयारी दर्शवली होती. या गव्हाची निर्यात फेब्रुवारी महिन्यापासून अफगाणिस्तानला नेण्यात येणार आहे.
ही वाहतुक कशी करायची याबाबत गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू होती. ती आता समाप्त झाली असून आता या निश्चित करण्यात आलेल्या मार्गाने या गव्हाची वाहतूक केली जाणार आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा मानवतावादी भूमिकेतून विचार करून तेथे मदत देण्यात यावी, असा आग्रह भारताकडून पहिल्यापासूनच धरला जात आहे. भारताने अफगाणिस्तानसाठी 50 हजार मेट्रीक टन गहू उपलब्ध करून देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय वाईट झाली.
याचा विचार करूनच भारताने ही घोषणा केली आहे. आता हा गहू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तानला पाठवला जाईल, अशी तयारी करण्यात आली आहे. यासाठी पाकिस्तानचेही सहकार्य लाभले असून अफगाणिस्तानसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.